Home जळगाव अवेळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार – आमदार किशोर...

अवेळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार – आमदार किशोर पाटील

370

निखिल मोर

पाचोरा , दि. ०२ :- भडगांव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दि. २९ रोजी गारपिट, अवकाळी पाऊस व सुसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील मका, दादर, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मी दि. १ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, भडगांवच्या तहसिलदार माधुरी आंधळे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह खडकदेवळा, तारखेडा, चिंचखेडा, कजगांव, तांदुळवाडी, मळगांव, भोरटेक सह अनेक गावांमध्ये जावुन शेती पिकांची प्रत्यक्ष पाहिणी केली असुन आज दि. २ मार्च रोजी होणाऱ्या अधिवेशनात प्रश्न मांडुन शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत जाहिर करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रश्न मांडणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी सायंकाळी ६:३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, नगरपरीषदेच्या गटनेत्या सुनिता किशोर पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपुत, डॉ. शेखर पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी हेही सांगितले की, राज्य सरकारने शेतकरी कर्ज माफीच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या असुन यात पाचोरा तालुक्यात १६ हजार व भडगाव तालुक्यात १० हजार शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ झाला आहे. व अधिवेशन सुरू असल्याने लवकरच दोन लाखांपर्यंतच्या कर्ज माफीची घोषणा होईल. याशिवाय दोन लाखा वरील आणि नियमीत बाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफीची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावर हसु पाहायचे होते. मात्र पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले. रब्बीचे पिक जोमाने दिसत असतांनाच निसर्गाने पुन्हा घाला घालुन एक महिन्यात काढणीसाठी येणारी पिके हातुन जात असतांनाचे पाहावयास मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसु उडाले आहे. यामुळे मी तातडीने नुकसान भरपाईसाठी अधिवेशनात प्रश्न मांडुन शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.