Home यवतमाळ घाटंजी नगर परीषद क्षेत्रातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात…!

घाटंजी नगर परीषद क्षेत्रातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात…!

31

मुख्याधिका-याच्या तुघलकी कारभाराची प्रहार कड जिल्हाधि-यांकडे तक्रार

प्रतिनिधी यवतमाळ

 यवतमाळ / घाटंजी – नगर परीषद इमारतीसह शहरात जागोजागी कच-याचे ढीग लागले आहे. पावसाळा तोंडावर आला असतांना नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. शहरात दुर्गंधी पसरली असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे घाटंजी नगर परीषदेच्या मुख्याधिका-याविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन वातीले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आज त्यांनी ही माहिती यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

घाटंजी शहराला नगर परिषदेचा दर्जा देऊन शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, या उदात्त हेतुने शासनाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला विशेष अधिकार दिले आहे. शहरातील प्रत्येक वार्डातील लोकांचे आरोग्य, पाण्याची समस्या, अंतर्गत रस्ते, विद्युत दिवे देखभाल, नाल्या सफाई या सर्व समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवर सोपवली आहे. परंतु, घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी याला अपवाद ठरत आहे. सध्या घाटंजी नगर परिषदेचा कारभार तुघलकी स्वरुपाचा सुरु आहे. शहरात जागोजागी कच-याचे ढिग लागले आहे. नाले सफाई करण्यात न आल्याने दुर्गंधी पसरली आहे. पावसाळयात शहरातील अनेक भागात पुराचे पाणी घुसत असल्याने नाले सफाई करणे गरजेचे असतांनाही दुर्लक्ष केले जात आहे. घाटंजी शहरातील नागरीकांची तहान भागविण्याकरीता अमृत योजना मंजुर करण्यात आली आहे. या योजनेचे काम सुध्दा संथ गतीने सुरु आहे. रस्त्यावर नाल्या खोदून ठेवल्यामुळे अनेकांचे अपघात झाले आहे. शहराच्या सुशोभीकरणासाठी मोठया प्रमाणात खर्च करुन लावलेले तिरंगी लाईट्स सुध्दा बंद असल्यामुळे नागरीक रोष व्यक्त करीत आहे. या सर्व बाबींकडे मुख्याधिकारी लक्ष देत नसल्यामुळे प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन वातीले यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. पत्रकार परीषदेला प्रहार चे बिपीन चौधरी, शुभम उदार, सागर मोहुर्ले, सुजीत बिवेकार उपस्थित होते.

कारवाई न केल्यास आंदोलन

घाटंजी नगर परीषदेचे मुख्याधिकारी राजु मोत्तेमवार कर्मचा-यांना उध्दट वागणूक देतात. त्यांनी कामगार दिनाच्या पर्वावर कामगारांना कामावरुन काढून टाकले ही दुर्देवाची बाब आहे. शहरात सुरु असलेल्या अनेक कामामध्ये गैरप्रकार सुरु आहे. त्यामुळे सरकारने या सर्व कामांची चौकशी करुन मुख्याधिका-याविरुध्द कारवाई करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.