आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अंतरवाली टेंभी येथे तातडीने भेट देऊन आरोग्य सुविधा पुरवावी – हलगर्जीपणा करणारया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
लक्ष्मण बिलोरे
जालना , दि. ०७ :- जिल्हा घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथे डेंग्यूची साथ पसरली असून अबाल वृद्ध तापेने फणफणले आहेत.डेंग्यूच्या तापेने गावात घबराट निर्माण झाली असून अनेकजणी उपचारासाठी रुग्णालयात उपचार घेत आहेत.येथील मनिषा कदम ( २५) प्राची प्रकाश कदम (६ महीने ),दिपक नवनाथ घाटूळ ( २० )या तिघांना डेंग्यूची लागन झाल्याने जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अंतरवाली टेंभी गावातील २०ते २५ अबालवृद्ध डेंग्यू सदृश्य तापेने फणफणत आहेत.ऋषिकेश हनुमान धावडे,श्रेया सचीन काटकर, अमोल सुनील बिंगले,सोहम शिवाजी गोळेकर यांच्यावर नुकताच उपचार करून विश्रांती घेण्यासाठी गावाकडे पाठविले आहे.अंतरवालीत डेंग्यू सदृश्य तापेचे रूग्ण वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.येथील आयुर्वेदिक दवाखाना बंद आहे.गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.येथील अनिरुद्ध शिंदे याचा ६आक्टोबर २०१९ रोजी डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला होता त्यामुळे जिल्हा भरात खळबळ उडाली होती. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असताना ग्रामपंचायत ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, डासांचा उपद्रव वाढला असताना धुरफवारणी केली नाही, यामुळेच आज ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आमदार, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अंतरवाली टेंभी येथे तातडीने भेट देऊन आरोग्य सुविधा पुरवावी ,या कामी हलगर्जीपणा करणारया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.