Home यवतमाळ शेतकरी हा माझा पक्ष,आत्मा,प्राण शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या तरुणांची फौज उभी करत राज्य काबीज...

शेतकरी हा माझा पक्ष,आत्मा,प्राण शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या तरुणांची फौज उभी करत राज्य काबीज करायचंय -शेतकरी नेते रविकांत तुपकर

11

यवतमाळ,दि.७ (  प्रतिनिधी ) यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता आपल्या प्रश्नावर पेटून उठण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यात कापूस,सोयाबीन ही नगदी पिके आहेत.तरीही सुद्धा मालाला भाव नाही,जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे,पण याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडे लक्ष द्यायला वेळ नाही,मतांच्या राजकारणात सर्व व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता प्रश्नावर जागरूक होत या नेत्यांना जाब विचारला पाहिजे, जो नेता आपल्याकडे मतं मागायला येईल त्याला सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी काय केलं हे हातात रूम्हणं घेवून विचारा,असे प्रखर मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विश्रामगृह,यवतमाळ येथे आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात(दि.७) रोजी बोलत होते.

यावेळी शेतकरी आंदोलक कृष्णा पुसनाके,सचिन मनवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले मी या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार या केवळ अफवा आहेत. मला संघटनेत राहूनच काम करायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे. माझ्यासाठी शेतकरी हा माझा आत्मा आहे. शेतकरी हा माझा प्राण आहे. त्यामुळे मी त्यांच्याचसाठी काम करत राहणार,माझ्या शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मला त्यांच्यासाठी लढायचं आहे. त्यामुळे त्यासाठी मी गेल्या २० ते ३० वर्षापासून कामाला कामाला लागलो आहे,मला शेतकऱ्यांसाठी लढत महाराष्ट्राभरात तरुणांची फौज उभी करायचीय,असंही तुपकर म्हणाले.

यवतमाळला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच आंदोलन केंद्र बनवू——
राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजूर आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनिय झाली असून याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे.तसेच सोयाबीन, कापूससह इतर शेती पिकांचे पडलेल्या दरामुळे यवतमाळ मधीलचं नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मात्र राज्य सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे सरकारला जागे करत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुढील काळात यवतमाळ जिल्हा हा आंदोलनाचा केंद्र असावा हा माझा मानस आहे.

कोट ——
सोयाबीनला भाव नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयाबाहेर सोयाबीन फेकून सरकारचा निषेध नोंदविला. सोयाबीन व कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे, पण त्यांच्या तीव्र भावनांची सरकारकडून दखल घेतली जात नाही, शेतकऱ्यांना सरकारचे तोकडे अनुदान नको तर त्याच्या मालाला भाव हवा आहे. जर सरकारने तातडीने सोयाबीन भाव वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेतले नाही, तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा असाच उद्रेक होत राहील, हे सरकारने लक्षात ठेवावे..!
—– रविकांत तुपकर,शेतकरी नेते.